परळी (बीड) : वीरशैव समाजाचे काशीपीठाचे जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी श्रावण मासानिमित्त वैजनाथ मंदिरात एक महिना अनुष्ठान केले. या अनुष्ठानाची सांगता अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात झाली. सांगता समारंभात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी महास्वामींचे आशीर्वाद घेतले.
सोनपेठचे नंदीकेश्वर शिवाचार्य महाराज, अंबेजोगाईचे शंभूलिंग शिवाचार्य महाराज, चन्नाबस्व शिवाचार्य महाराज, आमदार आर. टी. देशमुख, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार, बीडचे नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर, परळीच्या नगराध्यक्षा सरोजिनी हालगे, भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ताप्पा इटके, वैजनाथ देवस्थान समितीचे सचिव राजेश देशमुख आदींसह वीरशैव समाजातील भगिनी व बांधव मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.
‘प्रवचनाच्या माध्यमातून महास्वामीजीनी समाज सुधारणेची जी चळवळ हाती घेतली आहे, त्यात सर्वानी सहभागी झाले पाहिजे. त्यांच्या सारख्या थोर महात्म्यांच्या विचारांची सर्वच घटकांना आज खरी गरज आहे. आजच्या राजकारण्यांनी त्यांचे विचार आत्मसात केले तर समाजाचे नक्कीच भले होईल. गरीब व हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व्हावी यासाठी त्यांनी सुरू केलेला शिष्यवृत्तीचा उपक्रम खरोखरच स्तुत्य आहे,’ असे सांगून पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने या सामाजिक उपक्रमाला पाच लाख रुपयांची देणगी दिली. वैजनाथ बँकेचे चेअरमन अशोक जैन व बीडचे नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांनीदेखील या उपक्रमासाठी प्रत्येकी एक लाख रुपये देणगी दिली.
‘लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा वारसा पंकजा समर्थपणे सांभाळत आहेत. सध्याचे त्यांचे धडाडीचे राजकीय कार्य पाहता मुलगी नको ही भावना कोणत्याही पालकांच्या मनात येणार नाही. उलट प्रत्येकाला अभिमानच वाटेल असेच त्यांचे कार्य आहे,’ अशा शब्दांत डॉ. शिवाचार्य महास्वामी यांनी पंकजा मुंडे यांचा गौरव केला.